फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पत्र


मुंबई – मागील काही दिवसांत औरंगाबादमधील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांवर हल्ले झाल्याच्या घटना देखील समोर आल्या असून, अशाच प्रकारच्या अन्य गुन्हेगारी घटना देखील वारंवार घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. तर, विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे.

तर, उद्योगनगरी संभाजीनगरमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असल्याचे ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. शिवाय, ट्विटसोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र देखील जोडले आहे.


आपल्या पत्रामध्ये फडणवीस म्हणतात, उद्योगनगरी औरंगाबादमध्ये सातत्याने उद्योजकांवर हल्ले होत असल्याच्या घटना अलिकडच्या काळात प्रकाशात आल्या आहेत. ८ ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकरक या तिघांना बाहेरून आलेल्या १५-२० कथित गुंडांनी मारहाण केली. यासंदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत.

तसेच, १० ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या, या मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरूस्ती केल्यावर त्याचे पैसे ने देणे अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषत: अलिकडच्या ८-१० महिन्यात अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणामी वर्षानुवर्षे न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो, शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावा, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून, हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. तसेच, आपण स्वतः यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, असे पत्राच्या शेवटी म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षाही व्यक्त केली आहे.