लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये यांचा ‘200 – हल्ला हो’


zee5 च्या ‘200 – हल्ला हो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. कारण अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर झालेले पुनरागमन, सत्यघटनेवर प्रेरित दमदार कथानकामुळेच.

सार्थकी दासगुप्ता दिग्दर्शित, ‘200-हल्ला हो’ ही गोष्ट आहे, 200 दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळी, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध न्यायायलयामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला. ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे.

या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाबाबत अमोल पालेकर म्हणतात, मला कथेमधील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा धागा आवडला. जो भारतीय चित्रपटांमध्ये आधी फार दिसायचा नाही. तसेच, जातीच्या दडपशाहीला बळी पडलेल्या स्त्रियांनी न डगमगता केलेला संघर्ष, हे तथ्य फार आवडले. जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध ऍस्ट्रोसिटीसाठी आवाज उठवणाऱ्या या स्त्रियांना हे एक अभिवादन आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला काम करायला अधिक छान वाटले. माझे रिटायर्ड दलित न्यायाधीशाचे पात्र आम्ही सखोल चर्चा करून रंगवल्यामुळे त्याला अनेक कंगोरे आहेत.

त्याचबरोबर रिंकू राजगुरू म्हणते, ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे, मला माझे पात्र हे स्त्रियांनी मिळवलेल्या न्यायाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी आहे, असे वाटले. स्वतःसाठी आणि इतरांसाठी बोलणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील या कथेतून आपल्याला कळते. सार्थक सरांनी (चित्रपटाचे दिग्दर्शक) जेव्हा पहिल्यांदा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेतील वास्तवाने हलवून टाकले. दलित स्त्रिया कशा रोज भरडल्या जातात, पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही, याचे मला फार वाईट वाटले. माझं रक्त अक्षरशः खवळले होते! म्हणूनच मी हे पात्र साकारणार आहे, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आवाज उठवते.