तळेगाव (टा) प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील – सुनील केदार


वर्धा :- कोरोना काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी केलेल्या एकत्रित कामामुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर गेले आहे. अशीच संघ भावना यापुढेही कायम ठेवा. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिली.

तळेगाव (टालाटूले) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केदार बोलत होते. यावेळी बजाज फाउंडेशनने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका सामाजिक दायित्व निधीतून भेट दिली. त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री केदार म्हणाले, बजाज नाव हे महात्मा गांधींपासून लोकांच्या जनकल्याणासाठी जुळलेले आहे, ती परंपरा त्यांनी अजूनही टिकून ठेवली हे महत्त्वाचे आहे.

आज स्वातंत्र्यदिनी हा देश बेरोजगारी मुक्त, गरिबीमुक्त, महिलांवर होणारे अत्याचाराच्या विचारापासून मुक्त करू, अशी प्रेरणा घेऊन कृती करण्याची गरज आहे. गांधी जिल्ह्याने संपूर्ण जगाला अहिंसा आणि शांततेचा विचार दिला आहे. हा विचार या जिल्ह्यातील नागरिकांनी कृतीत उतरवून संपूर्ण देशाला एक नवा संदेश द्यावा असे प्रतिपादन घटनेच्या आधारावर या देशातील जाती धर्माच्या लोकांना एकत्र करीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. घटना राहिली नाही तर प्रगतीच्या मार्गावर निघालेला हा देश कोलमडून पडायला वेळ लागणार नाही, सर्व सामान्य गरीब माणसाला स्वतःचा आवाज बुलंद करण्याची व्यवस्था उध्वस्त होईल आणि हा देश पुन्हा गुलामीच्या खाईत जाईल.

म्हणून घटनेने दिलेले अधिकार आणि व्यवस्था मान्य केली पाहिजे, कारण आपली लोकशाही घटनेवर चालते. ही घटना सांभाळणे म्हणजे खरी देशभक्ती आहे. स्वातंत्र्याच्या मार्गावर चालणारे पाऊल आहे, ती टिकवून ठेवणे आपल्या कर्तव्याचा भाग आहे असेही बोलताना केदार म्हणाले. चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या पहिजे यासाठी लोकप्रतिनिधी नेहमीच प्रयत्न करतात. 30 हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र दिले जाते. लोकार्पण झालेल्या या आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळतील. संस्थात्मक प्रसूती आरोग्य केंद्र फार महत्वाचे ठरते.

24 तास आरोग्य सेवा मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा असते. पण आपण डाक्टरांची काय परिस्थिती आहे, हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. आज डॉक्टर ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी तयार होत नाहीत. डॉक्टरांना मारहाण करणे चुकीचे आहे. डॉक्टर हा माणूस आहे, त्यांच्याकडून गंभीर चूक झाली असेल तर त्याची निश्चित चौकशी होईल.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रला एकच डॉक्टर आहे. त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करताना त्यांना पण सहकार्य करा. हे हॉस्पिटल चांगले ठेवा हे आपले हॉस्पिटल आहे अशी भावना मनात ठेवा असे आवाहन आमदार रणजित कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी बजाज फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि बांधकाम अभियंता डोळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.