… तर राज्यात पुन्हा निर्बंध लावणे अपरिहार्य असेल, कोरोना टास्क फोर्स प्रमुखांची माहिती


मुंबई : एकीकडे राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे, तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. जर राज्यामध्ये ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले, तर निर्बंध पुन्हा लावणे हे अपरिहार्य असेल, अशी माहिती राज्याचे कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली आहे.

याबाबत डॉ. संजय ओक म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता विसरून चालणार नाही. यामध्ये आर्थिक चक्राला गती देण्यासाठी, सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी समतोल आणि समन्वय याचा मध्य साधण्याची गरज होती. म्हणून टास्क फोर्सने अनेक बैठका घेऊन शासनाला निर्बंध कसे शिथिल करता येतील, याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील दुकाने, मॉल्स, जिम खुली करण्यात आली आहेत, पण हे निर्बंध शिथिल करत असताना सरकारने समाजाकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. मास्क सोशल डिस्टंसिंग, जिथे-जिथे वर्क फ्रॉम होम शक्य आहे, या प्रणालीचा वापर करणे, कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवणे, क्यूआर कोड आयडी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे एकीकडे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असली, तरी दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा पुन्हा निर्बंध लावणे हे अपरिहार्य असेल, असे ओक यांनी सांगितले.

डॉ संजय ओक यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिएंटची राज्यात होणारी वाढ हा फारसा चिंतेचा विषय जरी नसला तरी निरीक्षणाचा विषय आहे. दुसऱ्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर डेल्टा व्हेरिएंटला सामोरे गेलो आहोत. त्यामुळे काही प्रमाणात सामुदायिक प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये आहे. पण, डेल्टा प्लस हे त्याचे अपत्य समोर आलेले आहे, त्याच्या गंभीर परिणामांकडे विशेषत्वाने कडे लक्ष देण्याची गरज आहे.

ते रोखण्यासाठी विविध उपाय शासन राबवत आहे. दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस ही डेल्टा व्हेरिएंट येण्याआधी तयार झालेली आहे. जशी विषाणूमध्ये उत्क्रांती होते तशी लसीमध्ये सुद्धा फरक घडत जातात. त्यामुळे दोन डोस घेतले, त्यांना डेल्टाचा संसर्ग होणार नाही अशातला भाग नाही किंवा असे कोणी समजू नये, असे त्यांनी सांगितले. पण, ज्यांनी लसीकरण पूर्ण केले आहे, त्यांच्यात डेल्टाची दाहकता परिणामकारकता निश्चित कमी असेल, असेही ते म्हणाले.

डॉ ओक म्हणाले की, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत विविध मतप्रवाह आहेत, टास्क फोर्स याबाबत विचारपूर्वक पावले टाकत आहे. याला काही कारणे आहेत ज्यामध्ये लहान मुलांना द्यायची लस अजूनही उपलब्ध नाही. ज्या लहान मुलांना आपण लस दिली आहेत, त्याचे परिणाम सप्टेंबरच्या मध्यामध्ये कळतील. सध्या कोरोना विषाणूची इनफेक्टिविटी, त्याची दाहकता अधिक असल्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत आपण संथ गतीने पावले टाकत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी स्पष्ट होईल, त्यावेळी शाळेबाबत आपण सकारात्मक विचार करू शकू, असे डॉ. ओक म्हणाले.