पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोसळू शकतो मुसळधार पाऊस : हवामान विभाग


मुंबई : कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 19 ऑगस्टपर्यंत सर्वत्र पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. मुंबईत देखील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. मुंबईत आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आज विदर्भात काही ठिकाणी प्रामुख्याने पश्चिम विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भासाठी 18 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात विदर्भात काही बदल बघायला मिळणार नाही. काही जिल्ह्यातील तापमान 35-36 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

आज मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बघायला मिळेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसामुळे मराठवाड्यातील पीकांना दिलासा मिळणार आहे. आज बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात काही ठिकाणी प्रामुख्याने 60-70 मिमीपर्यंत पावसाचा अंदाजआहे.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताआहे.

तर मध्यम ते मुसळधार पावसाची मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. पण, 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर बघायला मिळणार आहे.

प्रामुख्याने घाट परिसरात चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. नाशिकसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातीलपाणीपातळीत वाढ होईल. 18 ऑगस्ट रोजी नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट ठेवण्यात आला आहे तर नंदुरबार आणि धुळ्यासाठी यलो अलर्ट असेल.