देशात तब्बल 6 दिवसांनंतर 35 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोना संकट अद्यापही कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटने सध्या देशात सर्वांची धास्ती वाढवली आहे. अशातच तज्ज्ञांकडून देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 32,937 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी 28,204 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे, देशात काल दिवसभरात 35,909 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 22 लाख 25 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 31 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 14 लाख 11 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 81 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 4 हजार 797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 89 हजार 933 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे. काल दिवसभरात राज्यात 130 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 37 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही.

धुळे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 09,59,730 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,92,660 (12.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,59,642 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या राज्यात 64 हजार 219 रुग्णावर उपचार सुरु आहेत. सर्वाधित 14 हजार 748 अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. तर नंदूरबार- 1, धुळे- 4, परभणी – 43, हिंगोली – 88, नांदेड- 49, अमरावती 53, अकोला- 33, वाशिम – 19, बुलडाणा – 30, यवतमाळ- 16, वर्धा- 7, भंडारा- 1, गोंदिया- 1, चंद्रपूर- 99, गडचिरोली- 30 या जिल्ह्यामध्ये अक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 267 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 308 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,083 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,834 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1921 दिवसांवर गेला आहे.