या एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा


भारत हा मंदिरांचा देश आहे. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तूरचना, इतिहास, पूजा नियम, स्थाने ही वेगवेगळी आहेत. तसेच प्रत्येक मंदिराची कांही ना कांही कहाणी आहे व प्रत्येक भाविकाचे स्वतःचे असे श्रद्धास्थानही आहे. मात्र देवाच्या भक्ती बरोबरच देशाच्या स्वातंत्र्याचा मानही जेथे राखला जातो असे एकमेव मंदिर आहे ते रांचीमधील पहाडी शिवमंदिर. या मंदिराला नुसते पहाडी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाला मंदिराच्या ध्वजाबरोबरच भारताचा तिरंगा फडकविला जातो.

या मंदिराची कहाणी मोठी रोचक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात यावर ब्रिटीशांचा ताबा होता व येथे ब्रिटीश, स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देत असत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्यदिनाला येथे स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकावला गेला.रांचीत फडकलेला हा पहिला तिरंगा होता. स्वातंत्र्यसैनिक कृष्णचंद्र दास यांनी तो फडकावला होता व शहीदांची आठवण व त्यांना सन्मान देण्यासाठी नंतर प्रतिवर्षी येथे ध्वजारोहण केले जाऊ लागले. येथे एक शिला आहे त्यावर १४ व १५ ऑगस्ट १९४७ चा मध्यरात्रीचा स्वातंत्र्याचा संदेश कोरला गेला आहे.

रेल्वे स्टेशनपासून ७ किमी वर असलेल्या या पहाडी मंदिराचे जुने नांव होते टिरीबुरू. ब्रिटीश आल्यानंतर त्यांचे नांव पडले फांसी गरी. कारण येथे स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकविले जात होते. समुद्रसपाटीपासून २१४० फूट व जमिनीपासून ३५० फूट उंचीच्या लहानशा टेकडीवर हे शिवमंदिर आहे. ४६८ पायर्‍या चढून महादेवाचे दर्शन घेता येते.मंदिराच्या टेकडीवर चढून गेल्यानंतर संपूर्ण रांचीचे मनोहारी दर्शन घडते. श्रावण व महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी जमते.

Leave a Comment