राज ठाकरेंचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना सणसणीत उत्तर


पुणे : मी ६ वर्षांचा असताना पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तिमत्वाला भेटलो. त्यानंतर त्यांना पाहत आणि वाचतच राहिलो. इतिहासातील प्रश्न त्यांच्याकडून अनेकदा समजून घेतले. ज्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इतिहास सांगतात, तेव्हा ते वर्तमानात कसे भानावर या हे देखील आवर्जून सांगतात. त्याचवेळी इतिहासातील चुका पुन्हा करू नका, असेही सांगतात. त्यांच्या इतिहासात दंत कथांना अजिबात वाव नाही, अशा शब्दात पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिले.

‘जीवनगाणी’, ‘जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘स्वरगंधार’ या संस्थांच्या वतीने आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्र घराघरात पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवशाहिरांचे अद्वितीय सुरांची देणगी लाभलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते 99 व्या ज्योतींनी औक्षण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भाजप आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, नुसता इतिहास ऐकायला गेले की रुक्ष वाटते, पण त्यांच्याकडून ऐकताना प्रसंग डोळ्यासमोर जिवंत होतात. बाबासाहेब म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा महापुरुष आहे. बाबासाहेबांकडून इतिहास समजून घ्यायला हवा. त्यांनी कधी इतिहासाला सोडले नाही. त्यांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही. त्यांनी अलंकारिक भाषा वापरली नसती तर ते किती कठीण होते हे कळले नसते. तुमच्या डोक्यात गोष्ट पक्की बसवतात. शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात नि मनामनात पोहोचविले. एकदा विचारले होते की तुम्ही पोवाडा म्हटला नाही तर शिवशाहीर कसे? इतिहास सांगण्यातून बोध घ्यावा.

आपल्या भाषणाची सुरुवात मनसेप्रमुख राज ठाकरे हे नेहमी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतात. पण राज ठाकरेंनी आज आपल्या भाषणाची ‘हटके’ सुरुवात केली. त्यांनी अर्ध्या चेहऱ्याच्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो अशी भाषणाची सुरुवात केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान इतिहासकार, संशोधक, शाहिर, चित्रकार, कीर्तनकार सगळी रूपे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दडली आहेत. ते स्वतः सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. लेखनावर प्रहार केले असतील, पण काहीही न बोलता जगून दाखवले, हा खूप मोठा गुण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे, समानता हवी असे सांगतानाच त्यांनी स्वतः जगून दाखविल्याचे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या, पाया पडावे अशी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे बाबासाहेब. मी दीड वर्षांनी बाहेर पडले आहे. मी फार शिकलेली नाही, पण लेखांमुळे मराठी बोलता येते. साने गुरुजी, ह. ना आपटे, खांडेकर, बंगालची पुस्तके वाचली..वाचनाची खूप आवड होती..लेखकांना भेटण्याची ओढ वाटायची..1943 साली दहा वर्षांची असताना गाण्याचे पाहिले रेकॉर्डिंग केले..बहिणीचे लग्न कोल्हापूरला होते. गो. नी दांडेकर भेटले. पाठीमागून एक व्यक्ती हसले. आम्हाला आमचे वाढदिवस लक्षात राहात नाही आणि शिवाजी महाराजांचा वाढदिवस किंवा सगळे कसे लक्षात ठेवता? असा भाबडा प्रश्न केला. त्यांना मी आवडले. 58 वर्षांची बाबासाहेबांशी ओळख आहे. मी कुणाला मागत नाही, फक्त प्रेम मागते.

शंकराची पिंड बाबासाहेबांनी दिल्यानंतर आयुष्य खूप छान झाले. ते फूल टवटवीत राहिले पाहिजे. कुणाला त्रास द्यायचा नाही. मन स्वच्छ ठेवायचे. बाबासाहेब यांनी खूप प्रेम दिले. लेखकांनी माझे आयुष्य समृद्ध केले. देवाने मला आयुष्याची 50 वर्षे दिली आहेत. त्यातील २५ वर्षे बाबासाहेबाना देत आहे. त्यांना १ लाख रुपये देत आहे.

बाबासाहेब म्हणाले, लताने तुम्हाला कुणाचा आवाज आवडतो? मी थोडा थांबलो आणि ‘कपबश्या’चा आहे असे म्हणालो. मंगेशकर कुटुंबिय आणि गो.नी. दांडेकर यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. मी वेगळे काही करत आहे, असे वाटत नाही. मी शिवाजींचा पुजारी नाही. शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे सर्वजण भारावतात. पुन्हा एकदा जन्माला यावे. प्रेम करायला शिका प्रेम शिकवता येत नाही, ते आतून यावे लागते.