देशात काल दिवसभरात 40 हजार कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. सध्या देशात दररोज 40 हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 21 लाख 17 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 2 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 85 हजार रुग्ण अजूनही कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची मागील काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल (गुरुवार) 6,388 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 61 लाख 75 हजार 010 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8 टक्के आहे. काल (गुरुवार) राज्यात 208 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (3) , हिंगोली (79), नांदेड (62), अमरावती (65), अकोला (44), वाशिम (21), बुलढाणा (86), यवतमाळ (13), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (20) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भिवंडी निजामपूर, मालेगाव, जळगाव, नंदूरबार, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 916 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 03,26, 812 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,75, 390 (12.67 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,98,397 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 507 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 279 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,191 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,928 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1819 दिवसांवर गेला आहे.