काल दिवसभरात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात काहीशी घट झाली असली, तरी धोका अद्याप कमी झालेला नाही. देशात आजही 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 41,195 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी 44,643 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच काल दिवसभरात 39,069 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 20 लाख 77 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 29 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 60 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 87 हजार रुग्णांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 5,560 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 944 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 66 हजार 620 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.82 टक्के आहे.

आज राज्यात 163 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 64 हजार 570 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (0) , हिंगोली (78), नांदेड (57), अमरावती (76), अकोला (38), वाशिम (20), बुलढाणा (77), यवतमाळ (13), वर्धा (11), भंडारा (0), गोंदिया (2), चंद्रपूर (75), गडचिरोली (18) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 419 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

परभणी महानगरपालिका, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदियामध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक 811 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 01,16, 137 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,69, 002 (12.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,01,366 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 676 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत काल दिवसभरात 289 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1157 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,16,949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,900 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1755 दिवसांवर गेला आहे.