आशियातील समुद्राची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे मुंबईसह देशातील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका


नवी दिल्ली – आशिया खंडातील देशांना जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीने गंभीर इशारे दिले आहेत. समुद्राची पातळी तापमान वाढीमुळे वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. जागतिक दरापेक्षा वेगाने आशियातील समुद्राची पातळी वाढत असल्याचे अहवालात सूचित करण्यात आल्यामुळे देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरे या शतकाच्या अखेरीस पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. ही शहरे शतकाच्या अखेरीस ३ फूट पाण्यात असतील, असे सांगण्यात आले आहे. जागतिक समुद्राची पातळी २००६ ते २०१८ या कालावधीत दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.

आयपीसीसीच्या अहवालाचे अंतराळ संशोधन संस्था नासाने मूल्यांकन केल्यानंतर भारतातील १२ शहरात शतकाच्या शेवटी पाण्याची वाढती पातळी जाणवण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते. पण असे बदल २०५० नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी दिसतील असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. समुद्राच्या पातळीत २१ व्या शतकात सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढतील. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१९८८ पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचे आयपीसीसी मूल्यमापन करते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केले जाते. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली असून डोंगरावरील बर्फाचे आवरण कमी होत आहे. हिमालयातून उगम पावलेल्या नद्याही १९७० पासून आकुंचन पावत असल्याचे, कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

किनारपट्टीवरील ‘या’ शहरांना शतकाच्या अखेरीस धोका!

  • कांडला- १.८७ फूट
  • ओखा- १.९६ फूट
  • भावनगर- २.७० फूट
  • मुंबई- १.९० फूट
  • मोरमोगाओ- २.०६ फूट
  • मंगळूरु- १.८७ फूट
  • कोचिन- २.३२ फूट
  • पारादीप- १.९३ फूट
  • खिडीरपूर- ०.४९ फूट
  • विशाखापट्टणम- १.७७ फूट
  • चेन्नई- १.८७ फूट
  • तुतीकोरीन- १.९ फूट