अन्नधान्य इष्टांक वाढविण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घ्या – हसन मुश्रीफ


कोल्हापूर : वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे. इचलकरंजी शहराला अन्नधान्य इष्टांक वाढवून मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडून उचित मार्गदर्शन मागवून घ्यावे आणि त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

इचलकरंजी शहराला अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वंचित कुटूंबियांना अन्न धान्याचा इष्टांक वाढवून मिळावा यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती. ते पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याला इष्टांक (लाभार्थी संख्येचा कोटा) ठरलेला आहे. परंतु इचलकरंजी शहराची सद्यस्थिती लक्षात घेता हा कोटा वाढवून मिळावा, यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू.

तत्पूर्वी इचलकरंजी शहरातील वाढती लोकसंख्या गृहीत धरून सुमारे 23 हजार 254 एवढा इष्टांक प्राधान्याने मंजूर होवून मिळावा यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडे मागणी केली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, न. पा. मुख्याधिकारी प्रदिप ठेंगल, मदन कारंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भात अर्थमंत्र्यांना भेटणार
सध्या कोरोना आणि महापूरामुळे राज्यापुढील आर्थिक संकटात भर पडली आहे. मात्र याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या आर्थिक प्रश्नासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांना लवकरच भेटून तोडगा काढू अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील विविध अडचणीबाबत मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा प्रशासन अधिकारी हेमंत निकम, नगरपालिका मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, सध्या सरकारकडेही आर्थिक चणचण जाणवते आहे. इचलकरंजी शहराचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहू तर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे प्रश्न एकत्रित स्वरुपात द्यावेत अशी सूचना केली.

तत्पूर्वी इचलकरंजी नगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून नगरपालिकेला नेहमीप्रमाणे मिळणारे अनुदान नियमित आणि लवकर मिळावे यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर केल्याची माहिती न. पा. मुख्याधिकारी ठेंगल यांनी दिली. याप्रसंगी न. पा. लेखापाल कलावती मिसाळ, प्रशासनधिकारी नम्रता गुरसाळे, कामगार अधिकारी विजय राजापूरे, कर अधिकारी आरिफा नूलकर आदी उपस्थित होते.