झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंनी साधला निशाणा!


मुंबई – दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्याचा प्रकार समोर आल्यावरून सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. आता भाजप नेते या मुद्द्यावरून निशाणा साधताना दिसत आहेत. या प्रकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


“आता कळले..ठाकरे सरकार मधील काही मंत्री..गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात.. झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?” असं आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.


तसेच, “मंत्रालयात दारूच्या बाटल्या! हे माझ्यासाठी अजिबात धक्कादायक नाही. नाईटलाईफ गँगचा मंत्री तिथे राहतो, तर नक्कीच तिथे पार्टी…दारू आणि बरच काही असणार… आता मंत्रालयात येणाऱ्याची कोरोना तपासणी करण्याअगोदर, पेंग्विन गँगपासून सुरूवात करत प्रत्येकाची अल्कोहल टेस्ट का केली जाऊ नये?, अशा शब्दात नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.