पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप


कोलकाता – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्यासह काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. अमित शहा यांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या हल्ल्यामुळे घाबरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी हे वक्तव्य कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर केले. अभिषेक आणि अन्य नेत्यांवर भाजपशासित त्रिपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ममता बॅनर्जी यांनी हा आरोप केला आहे. त्रिपुरामध्ये २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तत्पूर्वी या राज्यात तृणमूल काँग्रेसने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश आणि जिथे जिथे त्यांचे सरकार आहे, तिथे भाजप अराजकता पसरवत आहे. आम्ही अभिषेक आणि अन्य पार्टी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्याशिवाय असे हल्ले शक्य नाहीत. त्रिपुरा पोलिसांच्या समोर झालेल्या हल्ल्यात त्यांचा हात असल्यामुळेच पोलीस मूग गिळून गप्प बसले आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असे हल्ले करण्याचा दम नसल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

पक्षाच्या कामानिमित्त त्रिपुरात टीएमसीचे युवा नेते देबांग्शु भट्टाचार्य, सुदीप राहा आणि जया दत्ता गेले होते. पण रस्त्यात त्यांच्या गाड्या अडवून हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अगरतलानंतर धर्मनगर येथे गोळ्या चालवल्या गेल्या आणि एक टीएमसीचे कार्यालय देखील फोडल्याचा आरोप त्यांनी केला. तर मागच्या काही दिवसात अभिषेक बॅनर्जी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दांड्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.