काल दिवसभरात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, तर 491 मृत्यू


नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट भारतात अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. आता देशात दरदिवशी जवळपास 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 39,070 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात काल दिवसभरात 43,910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ऑगस्टमध्ये तिसऱ्यांदा 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 1 ऑगस्ट रोजी 40,134, 2 ऑगस्ट 30,549, 3 ऑगस्त रोजी 42625, 4 ऑगस्ट रोजी 42982, 5 ऑगस्ट रोजी 44643, 6 ऑगस्ट रोजी 38628 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 19 लाख 34 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 4 लाख 27 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 10 लाख 99 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अद्याप चार लाखांहून अधिक आहेत. एकूण 4 लाख 6 हजार रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.