टोकियो : नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. नीरज वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा एकमेव दुसरा भारतीय ठरला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने सुवर्णपदकासह भारताच्या अॅथलेटिक्स पदकाची 121 वर्षांची प्रतीक्षा देखील संपुष्टात आणली आहे. पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्राने भाला 87.03 मीटर लांब फेकला आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटरने सुधारणा केली, पण तो त्यापुढे जाऊ शकला नाही. चोप्राने 87.03 मीटर, 87.58 मीटर, 76.79 मीटर आणि 84.24 चे चार वैध थ्रो व्यवस्थापित केले, तर त्याचे शेवटचा चौथा आणि पाचव थ्रो अपात्र ठरला.
Tokyo Olympics : भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने घडवला इतिहास; सुवर्ण पदकावर कोरले नाव
चीनमध्ये झालेल्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानंतर नीरज चोप्रा वैयक्तिक श्रेणीतील भारतासाठी दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरजने पात्रता फेरीत जसे भालाफेकीवर वर्चस्व गाजवले त्याचप्रमाणे अंतिम फेरीत देखील त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले. दरम्यान, 1900 मध्ये नॉर्मन प्रिचर्डने ट्रॅकवर दोन रौप्य पदके जिंकल्यानंतर ऑलिम्पिक खेळात कोणत्याही भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फील्डमध्ये व्यासपीठावर स्थान मिळवता आले नव्हते. मिल्खा सिंग आणि पीटी उषा अनुक्रमे 1960 आणि 1984 खेळात जवळ पोहचले होते, पण त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक भाग्यवान ठरला आहे. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे एकमेव सुवर्ण पदक आहे. तसेच आज भारताने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकली आहेत. तत्पूर्वी लंडन ऑलिम्पिक खेळात भारताने 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 6 पदके जिंकली होती. टोकियो येथे आयोजित महाकुंभमध्ये भारतासाठी चोप्राव्यतिरिक्त वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोर्गोहेनने कांस्य, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने देखील कांस्यपदक भारताच्या पदरात पाडले. तर कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य व पुरुष हॉकी संघाने 41 वर्षाची ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणत ऐतिहासिक कांस्यपदक पदके भारताच्या पदरात पाडली आहेत.