कुंभमेळा बनावट कोरोना चाचणी प्रकरणी ईडीची छापेमारी


नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले होते. ऐन कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना देशात कुंभमेळ्याचे आयोजन करण्यावरुन मोठ्या प्रमाणार टीका केली गेली. पण, त्यामध्ये कोरोना लसीकरण आणि इतर नियमांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचे सांगितले गेले होते. अखेर, यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कुंभमेळा प्रतिकात्मक करण्याचा निर्णय जाहीर केला.

कुंभमेळ्यामध्ये या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या बनावट चाचण्या करण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकारामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक प्रयोगशाळांमध्ये छापे टाकले असून या छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

या चारही राज्यांमधील पॅथोलॉजी लॅब्जवर ईडीने शुक्रवारी छापे टाकले. यात नोव्हस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्ज, मॅक्स कॉर्पोरेट सर्विसेस, डॉ. लाल चंदानी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नालवा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. दिल्ली, हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या ठिकाणी या लॅब्जच्या संचालकांच्या घरी देखील ईडीने छापेमारी केली आहे.

यासंदर्भात उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकणामध्ये बोगस चाचण्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा उत्तराखंड पोलिसांनी नोंदवला होता. त्यासंदर्भात हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामधील बोगस कोरोना चाचणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे छापे मारल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या छाप्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक घोटाळ्याच्या या चौकशीदरम्यान हे समोर आले आहे की या प्रयोगशाळांना केंद्र सरकारने कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे कंत्राट दिले होते. पण, या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात अगदीच कमी कोरोना चाचण्या केल्या, पण चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत. त्यासोबतच, त्यांनी बोगस बिले देखील तयार केली असून त्या आधारे आर्थिक फायदा करून घेण्याचा त्यांचा हेतू होता.

कधीच कुंभमेळ्याला ज्या लोकांनी भेटही दिलेली नाही, अशा लोकांच्या चाचण्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. या लॅब्जनी केलेल्या खोट्या चाचण्यांमुळे कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारमधील पझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के दाखवला गेला. मात्र, प्रत्यक्षात तो ५.३ टक्के असल्याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणवार बनावट कागदपत्र, बोगस बिले, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मालमत्तेसंबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.