चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर भाजप-मनसे युतीसंदर्भात फडणवीसांचे वक्तव्य


मुंबई – आज (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. राजकीय वर्तुळात या भेटीनंतर तर्कवितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे. भविष्यात भाजप व मनेस यांची युती होणार का? हा देखील प्रश्न अनेकांच्या मनात सध्या निर्माण झालेला आहे. तर, या दोन्ही नेत्यांची मागील २० दिवसांत ही दुसरी भेट असल्यामुळे चर्चा अधिकच रंगल्या आहेत. पत्रकारांनी या भेटीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी परप्रांतीयांचा मुद्द्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नसल्याची भूमिका मांडली.

मला असे वाटते चंद्रकांत दादांनी भेटीनंतर स्पष्ट केले आहे. जेव्हा नाशिकमध्ये भेट झाली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिले होते. त्यांनी त्यांना सीडीदेखील पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. युती वगैरे या विषयावर कोणतीच चर्चा झालेली नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितलेले आहे. महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधने नाहीत. राज ठाकरे आणि आमच्या पक्षामध्ये फरक एवढाच आहे की, परप्रांतीयांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे, हा आमच्यातील समान धागा निश्चितपणे असल्यामुळे दुसऱ्या मुद्द्यांचे जोपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबाबतही आपले मत माडलं. संपूर्ण भारताची ही मागणी होती. जेव्हा पहिल्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला. तेव्हा देखील संपूर्ण भारतातून लोकांनी ही मागणी केली होती, की मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून संबोधित केले जावे. ज्या काळात हिटलर जर्मनीच्या ऑलिम्पिकमध्ये असा दावा करत होता. ज्यांची सुपेरियर रेस आहे असे जर्मन लोकच जिंकू शकतात. त्यावेळेस मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीचा ८-१ ने पराभव केला. हिटलरचा गर्व पूर्णपणे मोडला होता. किंबुहना या देशात ऑलिम्पिकला सुवर्णकाळ जर कुणी दाखवला असेल, तर मेजर ध्यानचंद यांनी दाखवला. अशा पुरस्काराला खऱ्या क्रीडापटूचे नाव दिले जात असेल, तर आपण त्याचे स्वागत करुया. हॉकीत कांस्य पदक मिळाल्यानंतर हे नाव दिले आहे. अत्यंत चांगल्या योगावर हे नाव दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.