मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय; आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती


मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी दोन दिवसात निर्णय होऊ शकतो, असे संकेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. त्याचबरोबर मुंबईत या मुद्द्यावरून आज भाजपने आक्रमक भूमिका घेत सुरू केलेल्या आंदोलनाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा राजकारणाचा विषय नाही, नागरिक जसे समजून घेत आहेत, तसे राजकारण्यांनी देखील समजून घ्यावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना म्हणाले की, आपण जीवाची काळजी घेत आहोत, रेल्वेबद्दल दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पुढील दोन दिवसात आपल्याला कळेल की दोन डोस घेतलेल्यांना लोकांसाठी केवळ रेल्वे नाही, तर इतर ठिकाणे देखील, मुभा देऊ शकतो का? काही सूट देऊ शकतो का? यावर थोडी काळजीपूर्वक चर्चा होऊन, आपल्याला कळणार आहे.

तसेच, अर्थात आंदोलन करावे, पण मला वाटते काही ठिकाणी लोक जसे समजून घेत आहेत, तसे राजकीय पक्षांनी देखील घ्यावे. यामध्ये राजकारण नसून, मला वाटतं सोबत काम करणे गरजेचे आहे. लोकांचे जीव वाचवणं गरजेचे आहे. दोन-चार दिवसांपूर्वी केंद्राकडूनही काही नोटीस आलेल्या आहेत, काही जिल्ह्यांमध्ये धोका टळलेला नाही. मला वाटते हे जे आपण काम करत आहोत, सगळे सोबत करत आहोत. लवकर तुम्हाला यावर काही सूट दिसेल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.