कोरोना लसीकरणावरुन नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जींनी सरकारला सुनावले


नवी दिल्ली – भारतात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसत असले, तरी केंद्र सरकारने निश्चित केलेले लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अजूनही रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा कमी राहात असल्याची टीका केली जात आहे. लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याची देखील अनेक बिगर भाजपशासित राज्यांकडून तक्रार केली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांचा देखील समावेश आहे. त्यातच, आता नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारला सुनावले आहे. तसेच, संपूर्ण देशासाठी ही समस्या असल्याचे देखील अभिजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

अभिजीत बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल अॅडवायजरी बोर्डाची पश्चिम बंगाल सरकारने नियुक्ती केली आहे. कोरोनासंदर्भात राज्याला सल्ला देण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीची स्थापना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आज कोलकातामध्ये या समितीची बैठक झाली. यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी लस पुरवठा, देशाची लसीकरण मोहीम आणि केंद्र सरकारचे अपयश या मुद्द्यांवरून परखड भूमिका मांडली आहे.

सर्वात मोठी समस्या ही आहे की संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल एवढे लसींचे उत्पादन आणि पुरवठा करण्यास केंद्र सरकार असमर्थ आहे. जर लसींचा पुरेसा साठा असता, तर लस तुटवड्यासंदर्भात सध्या होत असलेल्या तक्रारी झाल्या नसत्या. संपूर्ण देशातच आज लसीचा सांगण्यात आलेला साठा पुरवला जात नसल्याचे अभिजीत बॅनर्जी यांनी नमूद केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या समितीची आज बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

पुरेशा प्रमाणात गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना लसींचा पुरवठा होत आहे. मी लोकांमध्ये भेजभाव करत नाही. पश्चिम बंगालला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिदिन कमी लस पुरवठा होत आहे. केंद्राला माझी विनंती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन आहे, की त्यांनी राज्यांमध्ये भेदभाव करू नये, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.