काल दिवसभरात 42 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. दरदिवशी 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद देशात केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून केरळात प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. केरळात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 22,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

बुधवारी केरळात कोरोनाच्या 22,414 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या वाढून 34 लाख 71 हजार 563 वर पोहोचली आहे. तर 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17,211 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 32 लाख 77 हजार 788 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या 1,76,048 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी 18 लाख 12 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 26 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 3 कोटी 9 लाख 74 हजार रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 6126 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.69 टक्के झाले आहे.

राज्यात काल दिवसभरात कोरोनामुळे 195 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 72 हजार 810 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सात जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. जालना (98) नंदूरबार (9), हिंगोली (65), अमरावती (82) वाशिम (76), गोंदिया (97), गडचिरोली (26) या सात जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 212 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नंदूरबार, परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये काल (बुधवारी) शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,87,44,201 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,27,194 (12.98 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,47,681 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

काल दिवसभरात मुंबईत 263 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 438 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,13,161 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4430 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1595 दिवसांवर गेला आहे.