मुंबईकरांच्या लोकल प्रवासासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका!


मुंबई – सामान्य मुंबईकरांसाठी गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनचा प्रवास कधी सुरू होणार? याविषयी मोठी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विरोधकांकडून देखील वारंवार मागणी केली जात असताना हे प्रकरण सध्या न्यायालयात देखील सुनावणीखाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार, यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतील एच-पश्चिम वॉर्डमधील वॉर्ड ऑफिसच्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

लोकल कधी सुरु होणार? त्याच्यावर देखील विचार सुरू आहे. आपण ज्या पद्धतीने दुकानांना वगैरे शिथिलता दिल्या आहेत. त्याचप्रमाणे लोकलचा निर्णय देखील जबाबदारीचे भान ठेऊनच घेणार आहोत. त्यासंदर्भात लवकरच मी तुमच्याशी संवाद साधेनच, असे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई आणि इतर ठिकाणी पाहिले, तर महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती संमिश्र स्वरूपाची आहे. अजूनही राज्यात कोरोनाची परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे, पण काही ठिकाणी चिंताजनक नसली, तरी चिंता करायला लागू नये, याची काळजी घेण्यासारखी आहे. जिथे आपण शिथिलता देऊ शकलो, तिथे दिली आहे. जिथे देऊ शकलो नाही, तिथे नाईलाज आहे. पण याचा अर्थ असा नाही की हे बंद म्हणजे कायमच बंदच राहील, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.