अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटींचा निधी मंजूर


नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. 100 कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी आज ट्वीट करुन दिली. यात तात्पुरत्या डागडुजीसाठी 52 कोटी रुपये आणि कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी 48 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील खराब झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. तसेच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट येथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

पावसाने कोकणात रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथे अक्षरश: थैमान घातले होते. मुसळधार पावसामुळे यासाठी महापूर आला होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांमध्ये पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहेत. त्यामुळेच केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक मंत्री ही रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिली आहेत.