उद्यापासून सुरु होणार कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया : उच्च शिक्षणमंत्री


पुणे : उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. कोणत्याही प्रकारची सीईटी यासाठी नसून नेहमीप्रमाणेच मेरीटलीस्टनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आम्ही आठ दिवसांत निर्णय घेणार असून त्यासाठी प्रशासनाशी आम्ही चर्चा करत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

दरम्यान उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत यंदा तेरा लाख नऊशे बासष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षापेक्षा तेहतीस हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती दिली. तसेच बारावीच्या निकालानुसारच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात आज कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यात सर्व कुलगुरूंचे एकमत झाले आहे. त्यासाठी तुकड्या वाढवून हव्या असतील तर 31 तारखेपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या संपुर्ण शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच प्रोफेशनल कोर्ससाठी 26 ऑगस्ट 2021 पासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल. पण, या तारखा आम्ही संबंधित यंत्रणांशी बोलून नक्की करण्यात येतील अशी माहिती दिली आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षी सीईटी नव्हती, त्या अभ्यासक्रमांना यावर्षी देखील सीईटी नसेल.

राज्याच्या वित्त विभागाकडून होकार मिळाला की प्राध्यापकांची भरती केली जाईल. सीईटी परिक्षा या ऑनलाईन होतील. पण त्या सेंटरवर जाऊन द्याव्या लागतील. घरातून देता येणार नाहीत. त्यासाठी सीईटीची सेंटर्स वाढवण्याचा आमचा विचार आहे. शासन आणि विद्यापीठ एकत्र चालली पाहिजेत.