धर्म परिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी!


अलाहबाद – अकबर आणि जोधाबाई यांच्या किस्स्याची देखील एंट्री उत्तरप्रदेशमध्ये लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या दरम्यान आता या संपूर्ण घटनाक्रमांमध्ये झाली आहे. तर, केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन केले जात असल्याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी वेळी मुघल बादशाह अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण देत, धर्म परिवर्तनापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. न्यायालयाने टिप्पणी केली की अकबर-जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून धर्म परिवर्तनाच्या अनावाश्यक घटनांपासून वाचले जाऊ शकते.

अकबर-जोधाबाईने धर्म परिवर्तन न करता विवाह केला. एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला, दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाहीअसा उल्लेख या टिप्पणीमध्ये करण्यात आला. न्यायालयाने सांगितले की धर्म आस्थेचा विषय आहे, हा आपली जीवनशैली दर्शवतो. ईश्वराप्रती भाव प्रकट करण्यासाठी एखादी विशिष्ट पूजा पद्धतच असणे गरजेचे नाही. विवाह करण्यासाठी समान धर्माचे असणे देखील आवश्यक नाही. अशावेळी केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने हे देखील नमूद केले की, अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनात धर्माबद्दल विशेष आस्था नसते. हा निर्णय केवळ दबाव, भीती व लालसेपोटी घेतला जातो. केवळ विवाहासाठी धर्म परिवर्तन चुकीचे आहे, याला काही घटनात्मक मान्यता नसते. तसेच, न्यायालयाने हे देखील सांगितले की, वैयक्तिक फायद्यासाठी केले गेलेले धर्म परिवर्तन, केवळ वैयक्तिक नुकसानच करत नाही तर, ते देश व समाजासाठी देखील घातक असते. अशा प्रकारच्या धर्म परिवर्तनाच्या घटनांमुळे धर्माच्या ठेकेदारांना बळ मिळते आणि विघटनकारी शक्तींना प्रोत्साहन मिळते.