बारावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता


पुणे – लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा ही परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती. राज्यात गेला महिनाभर पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला आहे. काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून पाऊस आणि पुरामुळे निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली आहे. देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण ही मुदत राज्य मंडळाला पाळता आली नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही विद्यार्थ्यांनाही उत्सुकता आहे. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. जुलैअखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल, असे म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे अनेक कामे थांबली आहेत. यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

यंदा राज्य शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द केली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर सीआयएससीईने दहावी-बारावीचा आणि सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केल्यामुळे राज्य मंडळ बारावीचा निकाल कधी जाहीर करणार याची विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे. राज्यातील महाविद्यालये-विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालानंतरच सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केल्यामुळे बारावीच्या निकालावर पदवी प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे.

राज्यातील काही भागातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी पाऊस, पूरपरिस्थितीमुळे निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली. नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. पण निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल. त्याबाबतची अधिकृत घोषणा राज्य मंडळाकडून केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.