राज्यातील दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भातील आदेश आज काढणार; उद्धव ठाकरेंची माहिती


सांगली – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भातील आदेश आज काढला जाईल, असे आज सांगलीमधील पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणे शक्य आहे, तिथे आम्ही करत आहोत. जिथे करणे थोडसे अवघड आहे, तेथील नागरिकांकडून सहकार्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणे सुरू झाले आहे, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्यामुळे आपत्ती ओढावली आहे. काही वस्त्यांचे पुनर्वसन आवश्यक आहे, पण नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. आपण निसर्गासमोर हतबल असल्याचेही देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

त्याचबरोबर, दोन-चार दिवसांपासून मी सर्वांना सांगत आहे की काही ठिकाणी काही प्रसंगी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामे, ज्याला आपण विकास कामे म्हणतो ती करत गेलो. पण ही आता आपत्ती आणि आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली, तर आपत्तीचे स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेले आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही तासांत किंवा एक दिवसात पडायला लागला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळत आहेत, रस्ते खचत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले.

अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका हजारो कुटुंबांना बसला असून घरासह व्यवसायाचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.