कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सांगलीत पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


सांगली : आज सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगलीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दौऱ्यातील पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भिलवडी गावाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी हा दौरा अवघ्या 5 ते 7 मिनिटांत आटोपला. यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनेही दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी येथे नागरिकांशी बोलताना आवर्जुन सांगितले की, सरकार सर्वोतोपरी मदत करेल, पण वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तसेच त्या निर्णयांसाठी तुम्ही आम्हाला साथ द्याल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जर पुनर्वसन करायचे असेल, तर काही जणांचा विरोध होण्याचीही शक्यता आहे. दरवर्षी पूर येतो, दरवर्षी नुकसान होते. चार महिने विस्थापितांचे जगणे जगावे लागते. हे सगळं कुठेतरी थांबवायचे असेल, तर पुनर्वसनाचा विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला, त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरु केले. सांगलीच्या या भागांत 4 लाख लोकांचं स्थलांतर केले. जीवितहानी न होण्याला प्राधान्यक्रम आहे. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता, ते दाखवले. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळीये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला नम्र विनंती आहे की, किती नुकसान झाले आहे, त्याचे सगळी आकडेवारी मिळत आहे. शेती, घरदार एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरु आहे.

कायमस्वरूपी तोडगा काही ठिकाणी काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, त्याला आपली तयारी हवी, कारण दरवर्षी हे पुंरचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की, परत दुसऱ्या वर्षी तेच. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार, असे काही झाले की, लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातील पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी बोलताना दिले आहे.