कंदहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानकडून रॉकेट हल्ला


कंदाहर – अमेरिकेने अफगाणिस्तानातून लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न तालिबानकडून केले जात असून, मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. तीन रॉकेट शनिवारी रात्री डागण्यात आले. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. या वृत्ताला विमानतळ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर पुन्हा एकदा तालिबान संकट उभे राहिले आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबानने अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली.

अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा काही दिवसांपूर्वी तालिबानने केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचे मुख्यालय असल्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यातच आता कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री कंदहार विमानतळाला लक्ष्य करण्यात आले. विमानतळाच्या दिशेने तीन रॉकेट डागण्यात आली. यात एक विमानतळाला धडकले, तर दोन विमानाच्या हवाई पट्ट्यांवर त्यामुळे रनवेचे नुकसान झाले असून, विमाने रद्द करण्यात आली. यापूर्वी ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.

एएफपी या वृत्तसंस्थेने कंदहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉकेट हल्ला झाल्याचे वृत्त दिले आहे. या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची तिथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे.

उत्तर अफगाणिस्तान या त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात तालिबानने जम बसवला असून तेथे वांशिक अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. अनेक कुटुंबे पलायन करीत असून भीतीयुक्त जीवन जगत आहेत. गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने म्हटले आहे.