‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : दादाजी भुसे


मालेगाव : संपूर्ण देशासह जगभरातील नागरिक कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहेत. या महामारीत ज्या कुटूंबाचा कर्ता व्यक्ती मयत झाला आहे अशा कुटूंबांना आज मदतीची गरज आहे. आई व वडील दोघेही मयत झाले आहेत अशा कुटूंबातील अनाथ बालकांसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. या महामारीमुळे आर्थिक संकटातील कुटूंबांना मदतीचा हात देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

टाटा रॅलीज इंडीया लि. (धान्या सिड्स) यांच्या सौजन्याने सामाजिक दायित्व निधीतून जीवनावश्यक घरगुती किराणा साहित्याचे किट्स वाटपाचा कार्यक्रम मंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडला, यावेळी मंत्री भुसे बोलत होते. कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे.

त्याच बरोबर कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यामुळे आर्थिक अडचणीतील कुटूंबांना मदतीचा हात देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक दायित्व निधीतून मदतीसाठी पुढे येवून समाजकार्यास हातभार लावण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करतांना, राज्यावर येणाऱ्या विविध संकटांचा मुकाबला करत शासन सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री भुसे यावेळी म्हणाले. यावेळी टाटा रॅलिज इंडीया कंपनीकडून साखर, तेल, तांदुळ, दाळी, मसाल्यासह किराण्यातील जिवनावश्यक 13 वस्तुंचा समावेश असलेल्या सुमारे 500 किट्सचे वितरण यावेळी करण्यात आले.

बि साईड यु कंपनीच्या ॲम्ब्युलन्स सेवेचे मंत्री भुसे यांच्या हस्ते उद्घाटन
मिनी आय.सी.यु. ची सेवा देणारी आधुनिक पध्दतीची ॲम्ब्युलन्स सेवा मालेगावकरांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगतांना मंत्री भुसे म्हणाले, कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण चांगली माणसे गमावली आहेत. महामारीचा मुकाबला करण्यासाठी मालेगाव प्रशासनामार्फत चांगले काम झाले असून यापुढे अशा सकंटांचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत. बि साईड यु कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ॲम्ब्युलन्स सेवा रुग्णांना नक्कीच दिलासा देतील असा विश्वासही मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

तर यावेळी कंपनीचे मालेगाव प्रतिनीधी जितेंद्र खैरनार यांनी अल्पदरात ॲम्ब्युलन्स सेवेचा लाभ घेण्यासाठी कॉल सेंटर क्रं.9405598962 व 9049027257 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बि साईड यु कंपनीचे व्यवस्थापक टोनी डिसोझा, डॉ.स्वप्नील निकम, गणेश येवला, ज्ञानदिप परब, अनंत खराडे आदि उपस्थित होते. यावेळी वडनेर खाकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जैन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रु. 2 लाख 50 हजाराचा धनादेश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सुपूर्त केला.