कोरोनाचा प्रकोप; दहा राज्यांना केंद्राने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना


नवी दिल्ली – पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या मागच्या चार दिवसात वाढली आहे. तर देशातील दहा राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील कोरोनास्थिती जाणून घेतली. तसेच कोरोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान असल्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

ज्या जिल्ह्यात मागील काही आठवड्यात कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल, असे सांगण्यात आले आहे. दहा राज्यातील ८० टक्के कोरोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत असल्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

राज्य सरकार कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यावर जोर देत आहे. या जिल्ह्यातील लसीकरण वेगाने केले जात आहे. तसेच या भागातील सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे. केरळमध्ये कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय पथक पाठवले आहे.