मी निव्वळ घोषणा करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला!


कोल्हापूर – अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकारने भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना मी निव्वळ घोषणा करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री, असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांनी आज दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीवरील कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आणि विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.

जी परिस्थिती पावसामुळे आणि पुरामुळे निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केले जावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच, त्यावरून उद्धव ठाकरे यांनी लगेचच टोला लगावला. मी निव्वळ घोषणा करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितले आहे.

अजूनही सांगली, कोल्हापूरमधील पाणी पूर्ण ओसरायचे आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तात्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहे. एनडीआरएफचे निकष बदलण्याची गरज देखील मी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली आहे. हे एनडीआरएफचे निकष २०१५चे आहेत. गेल्या वेळी आपण एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केली असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस देखील येथेच असल्याचे मला कळले. त्यांना मी सांगितले थांबा मी येतो. कारण मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. यात कुठेही मला राजकारण करायचे नाही. यात त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील, तर त्याचे स्वागतच करू. तिथे काही बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही. दरवाजेच नव्हते. सगळ्यांच्या घरात पाणीच घुसले होते, तर दरवाजे का राहतात. मी त्यांना सांगितले की तुम्हाला मी बोलवतो. मुंबईत आपण भेटू. ज्या सूचना असतील, त्यांच्यावर एकमत होईल. माझ्यासोबत तीन पक्ष आहेतच. तो चौथा पक्ष देखील येईल. महाराष्ट्रातील हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर उद्या जे काही आपण निर्णय घेऊ, त्याच्या आड कुणीही येणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.