पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बातम्या केल्या तर बदनामी कशी?; उच्च न्यायालयाचा शिल्पाला सवाल


मुंबई – पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटक झाल्यानंतर सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमधून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिल्पाने या याचिकेत सोशल मीडियासह वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांना प्रतिवादी केले होते. कनिष्ठ न्यायालयाने राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिल्पाने ही याचिका केली होती. दरम्यान शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली.

माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्या या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून आहेत. त्याला आव्हान कसे दिले जाऊ शकते? तो बदनामीचा प्रकार कसा म्हटला जाऊ शकतो? हे म्हणजे शिल्पा शेट्टीविषयी काहीच बोलू नका, असे सांगण्यासारखे आहे. शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते आणि माध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा प्रकरणात झालेल्या चौकशीविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या असतील, तर त्याविषयी बदनामीचा दावा कसा होऊ शकतो?, असा प्रश्न न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना विचारला होता.

उच्च न्यायालयाने वकील अॅड. डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले की, तुमच्या अशीलच्या पतीविरोधात गुन्हा दाखल आहे आणि यात न्यायालय कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. कोणीही आपला अशील असू शकतो, परंतु बदनामीसाठी कायदा आहे. वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी शिल्पाने याचिकेत केली होती. आपल्याबाबतची चुकीची माहिती संकेतस्थळांवरून काढून टाकावी, सोशल मीडियावरूनही याबाबतचे व्हिडिओ हटवण्यात यावेत, तसेच माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाने केली होती.