महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील निर्बंध १ ऑगस्टपासून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो, असेही म्हटले आहे.

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अद्यापही जास्त असल्यामुळे तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत, ते शिथिल करण्यासंबंधी आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवत आहोत. मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

त्यांनी पुढे बोलताना इतर २५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट अतिशय कमी आहे, जिथे वाढीचा दर कमी आहे, तेथील निर्बंध शिथिल करत दुकानांना ४ ऐवजी अतिरिक्त वेळ सुरु ठेवण्यासाठी मुभा देऊ शकतो, असे सांगितले. त्याचबरोबर दरम्यान लसीचे दोन्ही घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानही द्यायची का याचा निर्णय दोन दिवसांत होईल. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असेही ते म्हणाले आहेत.

कोरोनाची तिसरी लाट जगातील अनेक देशांमध्ये आली आहे. पण लसीकरण झाल्यामुळे त्याची दाहकता कमी आहे. लागण होत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी असल्यामुळे हे संक्रमण गंभीर स्वरुपाचे नाही. तिसऱ्या लाटेसंबंधी बोलताना अर्थचक्र चालले पाहिजे, याकडेही लक्ष दिले पाहिजे. फार काही निर्बंध घालूनही चालत नसल्यामुळे काही निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात जेव्हा तिसरी लाट येईल, तेव्हा येईल, पण राज्याची तयारी आहे का हे महत्वाचे आहे. आमची तयारी झाली आहे. जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सर्व बाजूंनी आपण तयार असल्याचे सांगताना राजेश टोपे यांनी लोकांना नियमांचे पालन करा आणि लसीकरणाला प्रतिसाद द्या, असे आवाहन केले.

देशातील दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली. यानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल केले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी मंत्र्यांनी केली आहे.