महाराष्ट्रात कोणाच्या पोटी राणेंच्या मुलांसारखी मुले जन्माला येऊ नये; भास्कर जाधवांची टीका


मुंबई – नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या याच वक्तव्यांवरून भाष्य केले असून महाराष्ट्रात कोणाच्या पोटी नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले जन्माला येऊ नये, असे जाधव यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार टीका केली आहे. मी नारायण राणेंना सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुले आहेत ना खरे सांगायला गेले तर अशी मुले महाराष्ट्रामध्ये कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेल. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात, मतमतांतर वेगळी असू शकतात, पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचे अजिबात भान नाही. कोणाबद्दल आपण काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुले आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेनेच्या वाढीमध्ये नारायण राणेंचा काडीचा हातभार नाही. त्यांनी स्वतःभोवती ते वलय तयार केले आहे. माध्यमांनी नारायण राणेंना मोठे केले आहे आणि शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपले अस्तित्व टिकवले आहे. यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नसल्याचेही भास्कर जाधवांनी म्हटले आहे.

जेव्हा नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा ९ आमदार त्यांच्याबरोबर गेले. दुसऱ्या निवडणुकीमध्ये एक तरी आमदार निवडून आला का? त्याच्या पुढच्या निवडणुकीत ते स्वतः निवडून आले का? त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का? ते वांद्रे येथून उभे राहिले तेव्हा निवडून आले का? त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचे वर्षश्राद्ध घातले. स्वतःच्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळमुळे रोवणार, असे सवाल भास्कर जाधव यांनी यावेळी केले.