आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यातील या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध होणार शिथिल !


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता ज्या ठिकाणी बाधितांच्या संख्येचे प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये अध्यादेश निघेल, असे देखील ते म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, निर्बंध हटवण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे बाधितांची संख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

या सर्व चर्चेदरम्यान, मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे. कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण, या सगळ्याचे नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार,

  • शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आणि फक्त रविवारी बंद
  • खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा
  • शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.
  • थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते.
  • एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, लग्नात, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाईल, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.