उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार १० हजारांची मदत; विजय वडेट्टीवारांची माहिती


मुंबई – राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घरातील साहित्य, कपडे, भांडी खरेदीसाठी तात्काळ १० हजार रुपयांची मदत वाटप सुरू करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अद्याप पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी पाणी ओसरले नसल्यामुळे बाधितांचे पंचनामे सुरु आहेत. दरम्यान ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्या म्हणजेच शुक्रवारपासून जमा होणार असल्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना ही माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केली आहे. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचे वाटप केले, तर अनेक आरोप होतात. पैशाचे वाटप बरोबर झाले नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नसल्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पूरग्रस्तांना वाढीव मदत देण्याची योजना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुराचा फटका आणि नुकसानीचा आढावा घेण्यात आला. प्रचलित नियमापेक्षा अधिक मदत द्यावी, असा मंत्रिमंडळाचा सूर आहे. परंतु अद्याप काही ठिकाणी पुराचे पाणी कायम आहेत. शेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

मदतीच्या पॅकेजबाबतचा निर्णय नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यावरच घेतला जावा, यावर सर्वाचे एकमत झाले. परिणामी सध्या प्रचलित नियमानुसार तातडीने मदतीचे वाटप करण्यात यावे आणि अतिवृष्टीत आतापर्यंत २१३ लोकांचा मृत्यू झाला असून आठ जण बेपत्ता आहेत. तर ५२ लोक जखमी झाले असून ४०० जणावरे तसेच ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. अतिवृष्टीमुळे १४०० गावांना फटका बसला असून पूरग्रस्त भागातील चार लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोकणातील १०४९ गावातील आठ हजार २३७ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून १२०० घरांना फटका बसला आहे.