देशात काल दिवसभरात 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 640 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाच दिवसांनंतर 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 43,654 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 640 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 41,678 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 84 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 22 हजार 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 6 लाख 63 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 99 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 27 जुलैपर्यंत देशभरात 44 कोटी 61 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 40 लाख 2 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 46 कोटी 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17.36 लाख कोरोनाचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 6,258 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 58 हजार 751 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के आहे. राज्यात काल 254 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 26 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 82 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (53), यवतमाळ (9), गोंदिया (53), गडचिरोली (57), चंद्रपूर (69) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 771 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76,057 (13.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,98,933 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात मुंबई महापालिका क्षेत्रात 343 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 11 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत सघ्या 5267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर आता 1377 दिवसांवर पोहोचला आहे.