आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली, पण आता सच्चे दिन पाहायचे आहेत – ममता बॅनर्जी


नवी दिल्‍ली : केंद्रातील मोदी सरकारवर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्द संपूर्ण देश अशी होईल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले, मी राजकीय ज्योतिषी नाही, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, आणखी कोणी नेतृत्व करणार असेल तर त्यात कोणतीही अडचण नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. संसद अधिवेशनानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकमेकांना भेटले पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत असेल तर इतिहास घडविला जाईल, असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

माझे सर्व विरोधी नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि येत्या काळात एखादे राजकीय वादळ निर्माण झाले, तर त्याला कोणीच रोखू शकणार नाही. विरोधी पक्षांनी यावर गांभीर्याने काम केल्यास सहा महिन्यांत त्याचे परिणाम दिसून येतील, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली, पण आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे असल्याचा टोला ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला लगावला.

ममता बॅनर्जी यांनी पेगासस प्रकरणावरुनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. हेरगिरीचा मुद्दा आपत्कालीन परिस्थितीपेक्षा गंभीर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की माझा फोन आधीच टॅप झाला आहे, जर मी माझा पुतण्या अभिषेक मुखर्जींशी बोलत असेन तर माझा फोनही आपोआप टॅप होतो. पेगाससने प्रत्येकाचे जीवन धोक्यात आणले आहे. ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत सर्वपक्षीय बैठकीची मागणीही केली होती.