प्रताप सरनाईकांसह कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा 23 ऑगस्टपर्यंत दिलासा


मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, त्यांची मुलं विहंग आणि पुर्वेश आणि नातेवाईक योगेश चांदेगाला यांना मुंबई उच्च न्यायालयाने मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी दिलेला तात्पुरता दिलासा 23 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरनाईक कुटुंबियांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयालाशी (ईडी) संबंधित टॉप्स सिक्युरिटीज प्रकरणासोबत सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश यापूर्वीच न्यायालयाने दिलेले आहेत.

आता 23 ऑगस्ट रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी पार पडणार आहे. सध्याच्या व्यस्त वेळापत्रकात यावर सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणात जर तपास यंत्रणेकडून नोटीस आली तर चारही याचिकाकर्ते त्यांना पूर्ण सहकार्य करतील, अशी ग्वाही याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यात एनएसईएल म्हणजेच, नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात विकासक योगेश देशमुखला अटक करण्यात झाली होती. सुमारे 5,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यातच देशमुख हे प्रताप सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी आता त्यांच्या मागावर असून सरनाईक गायब असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता.

सरनाईक यांच्या विहंग ग्रुपवर ‘आस्था ग्रुप’ या काळ्या यादीतील कंपनीसोबत एनएसईएलमध्ये 250 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विहंग आणि आस्था ग्रुप यांना संयक्त विद्यमाने विहंग हाऊंसिग प्रोजेक्ट नावाने प्रकल्प सुरू केला आणि त्यातंर्गत विकासक देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी केल्या. त्यातील काही जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला 22 कोटींची फसवणूक समोर आली. त्यात एक कोटी शेतकऱ्याला देण्यात आले. त्यात सरनाईक यांनी 12 तर उर्वरीत 10 कोटी देशमुख यांच्या खात्यात वळविण्यात आल्याचे निदर्शनास आले.

ईडीने साल 2014 मध्ये टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून प्राधिकरणाकडून भूखंड जप्तीची पुष्टी केली होती. तसेच या जागेचा कोणताही व्यवहार होऊ नये म्हणून ईडीने स्थानिक महसूल प्राधिकरणास जप्तीबाबत माहिती दिली होती. पण, सरनाईक यांच्या मदतीने विकासक देशमुख यांनी जानेवारी महिन्यात ईडीने जप्त केलेला भूंखड व्रिकीसाठी काढल्याची बाब निदर्शानस आली आणि ईडीने याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. ईडीने यापूर्वीही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. टॉप्स ग्रुप या खासगी सिक्युरिटी फर्मशी संबंधित मनी लॉड्रींग प्रकरणात तूर्तास प्रताप सरनाईक, विहंग आणि योगेश यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.