काल दिवसभरात देशात 29,689 कोरोनाबाधितांची नोंद, तर 415 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 3 लाख 98 हजार 100 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर पोहोचली आहे. तर महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 वर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 44 कोटींच्या पार पोहोचला आहे. काल दिवसभरात 57 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले. त्यानंतर देशात आतापर्यंत 44 कोटी 10 लाख 57 हजार 103 डोस देण्यात आले आहेत.

आयसीएमआरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात भारतात 17 लाख 20 हजार 110 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आता एकूण 45 कोटी 91 लाख 64 हजार 1217 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. काल (सोमवारी) 4,877 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 हजार 077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 46 हजार 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के आहे.

राज्यात काल 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 44 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 88 हजार 729रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (57), यवतमाळ (9), गोंदिया (60), गडचिरोली (61) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

धुळे, नंदुरबार, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 561 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 69,95, 122 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,69,799 (13.434 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,01,758 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,518 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.