पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त


नवी मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पूरग्रस्तांना/आपदग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील यांनी केले आहे.

आज सायंकाळी कोकण भवन येथे आपतग्रस्तांसाठी पोहोचविण्यात येणाऱ्या वस्तू व सेवा-सुविधांबद्दल सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. रत्नागिरी आणि रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

त्यानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयात समन्वय अधिकारी नेमण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमांतून आपतग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदत पोहोचविली जाईल. या आढावा बैठकीस उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक कर) सोनाली मुळे, उपायुक्त (पुरवठा) विवेक गायकवाड, उपायुक्त (पुनर्वसन) पंकज देवरे, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे आदि उपस्थित होते.