केंद्र सरकारला ‘या’ कोरोनाबाधित २२ जिल्ह्यांची चिंता!


नवी दिल्ली – देशभरातील अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या आणि मृत्यूदर या आधारावर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक राज्य सरकारांनी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात आला आहे. पण, अद्यापही भारतात आणि जगभरात रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसून ती चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर अजूनही कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जागतिक स्तराचा विचार केला, तर अजूनही कोरोना संपण्यासाठी बराच कालावधी जायचा आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला अत्यंत कठोरपणे काम करावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना लव अग्रवाल यांनी देशातील २२ जिल्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. देशात असे २२ जिल्हे आहेत, जिथे वेगाने रुग्णवाढ होत आहे. यामध्ये केरळमधील ७ जिल्हे, मणिपूरमधील ५ जिल्हे आणि मेघालयातील ३ जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे म्हणाले. गेल्या ४ आठवड्यांमध्ये प्रामुख्याने या जिल्यांमध्ये वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्याची जास्त चिंता असल्याचे देखील लव अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

त्याचबरोबर देशात ६२ असे जिल्हे आहेत, जिथे दिवसाला १०० हून जास्त रुग्ण आढळत आहेत. विशेषत: रोज आढळणारी ही कोरोनाबाधितांची संख्या या जिल्ह्यांमधील विशिष्ट अशा भागांमध्येच आढळून येत असल्याचे देखील अग्रवाल म्हणाले आहेत.