चिपळूण : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचा अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आज रत्नागिरीतील पूरग्रस्त भागाची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाहणी केली. पण, अवघ्या अर्ध्या तासात राज्यपालांनी चिपळूण दौरा आटोपला आणि परतीच्या मार्गावर रवाना झाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आले असून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी त्यांचेपुढे चिपळूण व खेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबद्दल सादरीकरण केले. pic.twitter.com/W9KNsxW31W
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 27, 2021
आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार होते. त्यानंतर त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.
चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी आपल्या या भेटीदरम्यान बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. चिपळूण शहराची अवघ्या अर्धातासात त्यांनी पाहणी केली. त्यानंतर लगेच दौरा आटोपून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी परतीच्या मार्गावर रवाना घाले. दौरा आटोपून राज्यपाल आता मुंबईकडे रवाना झाले आहे.
On a visit to Ratnagiri district, Governor Bhagat Singh Koshyari reviewed the flood situation in Chiplun and Khed pic.twitter.com/2cEDeFypxw
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 27, 2021
दरम्यान, चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ अतिवृष्टीमुळे आली आहे, पण प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे राज्यपालांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र सरकारकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी असल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
राज्यपालांनी या आढावा बैठकीत प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदतकार्य याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.