राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना पाठवली आपल्या एका मुलाखतीची लिंक


मुंबई – राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप आणि मनेसे युतीबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर अनेक दिग्गज नेत्यांनी भाष्य देखील केले आहे. पण युती करताना पक्षांचे विचार आणि भूमिका जुळणे फार महत्वाचे असते. परप्रांतीयांसदर्भात मनसेच्या असलेल्या भूमिकेवर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. तसेच यापुर्वी मनसेने परप्रांतियांविरोधातील भूमिका बदलली, तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. राज हे आश्वासक आहेत. पक्षीय पातळीवर विचारांती युतीबाबतचा निर्णय होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांनी राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान, परप्रांतीयांसंबधी घेतलेल्या भूमिकेसंबंधीचा गैरसमज दूर करण्यासाठी राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना एका मुलाखतीची लिंक पाठवली आहे.

यापर्वी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची शासकीय विश्रामगृहात धावती भेट घेतली होती. राज यांनी आपणास यावेळी परप्रांतीयांबाबत आपल्या भूमिकेचा विपर्यास केला जात असल्याचे सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले होते. त्यामुळे भाजप-मनसे युती होणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, या युतीबद्दलच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका मांडत भारतीय जनता पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. मनसेसोबत युती करण्याबाबत काही चर्चा झाली का अशी विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत. भारतीय जनता पार्टीने भाषेच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. असा भेद आम्हाला मान्य नसल्यामुळे मनसे आणि भाजप यांची विचारधाराच जुळत नसल्यामुळे युतीचा कोणताही विचार नाही.

भाजप नेत्यांकडून यापूर्वीही अनेकवेळा मनसेसोबतच्या युतीबद्दल सकारात्मक संकेत दिले गेले. पण, तशी कोणतीही थेट बोलणी झाल्याचे दिसलेले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युती करण्यातील अडथळा अनेकवेळा स्पष्ट केला आहे. याबद्दल बोलताना एकदा चंद्रकांत पाटील म्हणाले होते, मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटले आहे की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. बदलत नाही म्हणताना आम्ही काही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका, असे म्हटलेले नाही.

स्थानिक लोकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्याने भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी मनसेचा कशाला विरोध आहे? परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे का? मग देशातील सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाखोंने मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणे तोही संघर्ष करणे आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. राज ठाकरे, मनसे अनेक प्रश्न सोडवतात. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही.