अजित पवार यांचा भास्कर जाधवांना टोला, जनतेत गेल्यावर त्यांचे ऐकून घ्यायचे असते


सांगली – रविवारी चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. चिपळूण बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून पाहणी केली. एका महिलेने यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा, पण आम्हाला उभे करा, अशी मागणी केली. महिलेचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्र्यांनीही धीर देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी अरेरावी केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना टोला हाणला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

आम्ही कुठेही गेलो, तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचे ऐकायचे असते. तेथील परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. पण मी भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी असेही स्टेटमेंट केले आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते. लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले, तर जनतेचे म्हणणे ऐकून घेणे आमचे कर्तव्य आहे. ते पार पाडले पाहीजे, असे अजित पवार यांनी सांगितले. सांगलीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत चर्चा केली.

व्यापाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेले. होते नव्हते ते सर्व गेले. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. पण नेमके त्याचवेळी भास्कर जाधव यांनी महिलेला आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाही, तुझा मुलगा कुठे आहे? तुझ्या आईला समजव, अशी प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहे.