पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – बाळासाहेब पाटील यांचे आदेश


सातारा : तारळी धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तारळी नदीला पूर आला. या पुराचे पाणी गावात शिरल्याने दुकानांची तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा. पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

पाली ता. कराड येथील पूर परिस्थितीची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली. यावेळी ते बोलत होते. या पाहणीप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुरामुळे पाली येथील पुलाचे नुकसान झाले आहे. या पुलाची तात्काळ दुरुस्ती करुन पूल वाहतुकीसाठी खुला करावा. गेल्या तीस ते पस्तीस वर्षात पाली येथे झालेला मोठा पाऊस आहे. पाटण तालुक्यातील विरगाव येथे भूस्खलन झालेल्या गावात बचावकार्य कोयनेच्या बॅकवॉटरमधुन सुरु करण्यात आले आहे.

तसेच आंबेघर येथे एनडीआरएफची टीम आज सकाळी पोहोचली असून मदतकार्य सुरु केले आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. त्या गावामध्ये प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही काम करीत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.