काल दिवसभरात 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 535 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात कायम असून गेल्या 24 तासांत 39 हजार 742 नव्या कोरोनाबाधितांची नोंद देशात करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन कोटी 13 लाख 17 हजार 901 झाली आहे. तसेच 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत 4 लाख 20 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या 24 तासांत 39, 972 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या तीन कोटी 5 लाख 43 हजार 138 वर पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 8 हजार 212 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास 46 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (शनिवारी) 45 लाख 74 हजार 298 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत लसीचे 43 कोटी 26 लाख 5 हजार 567 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल (शनिवारी) 6,269 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 29 हजार 817 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35टक्के आहे.

224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद राज्यात काल झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (56), यवतमाळ (9), गोंदिया (58), गडचिरोली (81) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

परभणी महानगरपालिका क्षेत्रात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 869 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 66,44, 448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,58, 079 (13.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,27,754 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,621व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 413 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 611रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,09,809 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,779 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1241 दिवसांवर गेला आहे.