Tokyo Olympics : भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने जिंकले रौप्यपदक


टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने इतिहास रचला आहे. ४९ किलो वजनी गटात मीराबाईने रौप्यपदक जिंकले आहे. भारताचे भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे दुसरे पदक आहे. सिडनी ऑलिम्पिकमध्ये (२०००) भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. हे पदक भारताला कर्णम मल्लेश्वरीने मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.

मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८४ किलो आणि दुसर्‍या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. पण ती तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिने स्नॅच फेरीत दुसरे स्थान पटकावले. ९४ किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी ११७ किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी झाली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे.