चिपळूणचे नागरिक संकटात असताना पालकमंत्री पळ काढतात; चित्रा वाघ यांची अनिल परब यांच्यावर टीका


मुंबई – कोकणासाठी गुरुवारची पहाट दहशतीची ठरली. कोकणातील जनजीवन बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पार कोलमडून गेले. पावसाने मुंबईनंतर कोकणात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण शहराला वेढा दिल्यामुळे हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरले. एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेकजण पाण्यात बुडाल्याचे वृत्त आहे. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका केली आहे.

चिपळूणचे नागरिक आस्मानी संकटामुळे अन्न-पाण्यावाचून तडफडत आहेत. त्याचबरोबर पुरामुळे दवाखान्यातून ऑक्सिजन पुरवठा रद्द झाल्यामुळे एकाच दिवशी ८ कोरोनाबाधित दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभे राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री असल्याची संतापजनक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.


गुरुवारी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात अडकलेल्या नागरिकांपैकी सुमारे दीड हजार नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुटका करण्यात आली. पण काही ठिकाणी अजूनही नागरिक अडकले असण्याची आहे. महापुराचे पाणी चिपळूण शहरात गुरुवारी पहाटेपासून शिरू लागले. दुपारपर्यंत शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला. पूर्वानुभवानुसार नागरिकांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलवले होते. पण पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्यामुळे भयावह स्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे असंख्य नागरिक आपापल्या घरात किंवा दुकानांमध्ये अडकून पडले होते.

पुराचा वेढा चिपळूणला पडल्यानंतर त्यातून एसटीचे आगाराही सुटू शकले नाही. पाणी वाढण्याचा धोका पाहता अनेक गाड्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे, आगारातील सामान सुरक्षित स्थळी हलवणे इत्यादी कामे पार पाडताना पाण्याची पातळी बघता बघता वाढली आणि एसटीच्या सात कर्मचाऱ्यांना जीव वाचविण्यासाठी एसटीच्या टपावर नऊ तास काढावे लागले. त्यांची पोलिसांनी नऊ तासांनी सुटका केली. या पुरात चिपळूण आगाराचेही मोठे नुकसान झाले.